चंद्रशाळा- कथासंग्रह - अभय वळसंगकर
कथालेखनाची प्रक्रिया लेखकाच्या मनात रोजच्या जगण्यात कणाकणानं आकार घेत असते. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्यातली माणसं यांचा वेध घेता घेता कल्पनाविष्कारानं लेखक कथा फुलवतात. मराठी कथाविश्वात, १९९१ ला सुरू झालेल्या जागतिकीकरणानंतर आणि अफाट नागरीकरणानंतर माणसं एकतर एकाच छापाची दिसू लागली आणि जीवनातलं अनुभवविश्वसुद्धा सपाट भासू लागलं. मूल्यव्यवस्थाही अधिक कोरडी झाली आणि त्याचा अनुभव शहर अथवा गाव यांनुसार न बदलता सारखाच दिसू लागला. या पार्श्वभूमीवर जगण्याच्या वाढलेल्या वेगातही माणसांच्या मनोविश्वाचा आणि व्यवहारांचा वेध सफलपणे घेण्याचं अवघड काम डॉ. अभय वळसंगकर यांच्या लेखनानं लीलया पेललं आहे. ‘चंद्रशाळा’तल्या प्रत्येक कथेतल्या शब्दाशब्दांतून याचा अनुभव येत जातो. आपल्या दृष्टीसमोर घडणारं हे सारं आपल्या नजरेला कसं पडलं नाही, असा प्रश्न पडण्यातच या कथांची वाचनीयता दडलेली आहे.